पुण्यात पावसाचा आणखी एक बळी   

रिक्षावर झाड पडल्यामुळे ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

पुणे : पुण्यात पावसाने आणखी एक बळी घेतला आहे. रिक्षावर झाड पडल्याने एका वृद्ध प्रवासी महिलेचा मृत्यू झाला. तर, रिक्षाचालक जखमी झाला. शुभदा यशवंत सप्रे (वय ७६, रा. नयनानंद सोसायटी, आनंदनगर, सिंहगड रस्ता) असे मृत महिलेचे नाव आहे. तर, रिक्षाचालक संजय अवचरे (धानोरी) जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. यंदाच्या पावसाने घेतलेला हा दुसरा बळी आहे. दोन दिवसांपूर्वी कर्वेनगर येथे अशीच घटना घडली होती. सोमवारी सायंकाळी दुचाकीवरून जाणार्‍या राहुल जोशी यांच्या अंगावर झाड कोसळल्याने मृत्यू झाला होता. 
 
कालची घटना नीलायम चित्रपटगृहाजवळ दुपारी सव्वातीनच्या सुमारास घडली. सप्रे या नीलायम चित्रपटगृहाजवळील उड्डाणपूलापासून रिक्षातून ना. सी. फडके चौकाकडे जात होत्या. त्यावेळी, पेशवे पार्कमधील गुलमोहराचे झाड पावसामुळे थेट अवचरे यांच्या रिक्षावर पडले. यात सप्रे आणि अवचरे गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी त्यांना तात्काळ खासगी रूग्णालयात दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच सप्रे यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यंदा पुण्यात मान्सून बारा दिवस आधीच दाखल झाला असून, शहरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच, झाडे आणि फांद्या कोसळण्याच्या अनेक घटना घडत आहेत. यातून महापालिका प्रशासनाचे धोकादायक अवस्थेतील झाडांकडे दुर्लक्ष असल्याचे स्पष्ट होत आहे. महापालिका आता तरी रस्त्याच्या बाजूला असणार्‍या धोकादायक अवस्थेतील झांडाकडे लक्ष देऊन त्याची छाटणी करणार का?, असा प्रश्न विचारला जात आहे.
 
रस्त्यांवर मृत्यूची टांगती तलवार
 
मुसळधार पावसामुळे शहरातील रस्त्यांना पुराचे स्वरुप येत आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. आता रस्त्यावरील झाडांमुळे नागरिकांचे जीव जात आहे. मात्र, महापालिका याकडे डोळेझाक करत आहे. खासगी जागेत असणार्‍या झाडांकडे महापालिका प्रशासनाचे लक्षच नाही. खासगी जागा मालकांनी धोकादायक झाड तोडावे, अशी भूमिका घेण्यात येते. एखाद्या मालकाने अर्ज केला तर याकडे पाहिले देखील जात नाही. महापालिका कार्यालयाचे उंबरठे झिजवल्यानंतर झाड कापण्याची परवागनी मिळते. जागा मालकालाच झाड तोडावे लागते. त्यामुळे अनेकजण धोकादायक झाड झाले तरी तोडत नाहीत. अनेक इमारतींच्या सीमाभिंतीच्या कडेला अशी झाडे आहेत. ती रस्त्यावर पडू शकतात. महापालिका उद्यान विभागाचे याकडे लक्ष नाही. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नावालाच झाडांची छाटणी केली जाते. प्रत्यक्षात संपूर्ण शहरात पाहणी करुन झाडांची छाटणी केली पाहिजे. यामध्ये खासगी जागेवरील धोकदायक झाडांचीसुध्दा पाहणी केली पाहिजे.

Related Articles